Loksabha 2019 : भाजपच्या प्रत्युत्तराला मनसेचा 'पेपर स्ट्राइक' 

Loksabha 2019 : भाजपच्या प्रत्युत्तराला मनसेचा 'पेपर स्ट्राइक' 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या "अरे लाव रे तो व्हिडिओ' मोहिमेमुळे घायाळ झालेल्या भाजपकडून पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांना शनिवारी प्रत्युत्तर दिले. मात्र, लागलीच मनसेचे संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत शेलार यांच्यावर पलटवार केला असून, मनसेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्याने 56 प्रश्‍नांची प्रश्‍नपत्रिका पाठवून भाजपची कोंडी केली.

लोकसभा निवडणूक न लढविता भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज ठाकरे यांनी राज्यात दहा सभा घेतल्या. या सभांमधून राज यांनी मोदी यांची आधीच्या आणि नंतरच्या वक्‍तव्याचे व्हिडिओ; तसेच दत्तक गाव, डिजिटल गाव आणि अन्य भूमिकांची व्हिडिओच्या माध्यमातून पोलखोल केली. यामुळे घायाळ झालेल्या भाजपने आज व्हिडिओच्या माध्यमातूनच राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. 

'शेकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा प्रचारासाठी चालतो, तर मग जवानांच्या मृत्यूचा मुद्दा प्रचारासाठी का चालत नाही?,' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केलेल्या या विधानाचा राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये समाचार घेतला होता. यावर आशिष शेलार यांनी मोदी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी अर्धवट दाखवल्याचा आरोप केला; तसेच या व्हिडिओतील मुद्दा दाखवायचाच होता तर संपूर्ण का दाखवला नाही, असा सवाल त्यांनी केला.

मोदींच्या काळात 38 हजार बलात्कार झाले, असा आरोप राज यांनी केला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या विधासभेतील माहितीचा व्हिडिओ शेलार यांनी दाखवला. मोदी सरकारच्या काळात महिला अत्याचारांबाबत केवळ विनयभंगांबाबत तीन टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावाची "पोलखोल' राज यांनी केली होती. मात्र खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या चित्रीकरणाच्या हवाल्याने शेलार यांनी राज ठाकरे यांचा मुद्दा खोडून काढला; तसेच गंगा नदीच्या संवर्धनासाठी केलेल्या कामांचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवून राज ठाकरे खोटे आरोप करत असल्याचे शेलार म्हणाले. 

मनसेची 56 प्रश्‍नांची प्रश्‍नपत्रिका 
शेलार यांच्या उत्तरानंतर आता मनसेकडून भाजपला 56 गुणांची प्रश्नपत्रिका दिली. या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर जाहीर केली. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ आहे, असेही सांगण्यात आले.

यामध्ये 'पाकिस्तानच्या कुठल्या नेत्याला मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटते?, शेतकऱ्यांना साले कोण म्हणाले ?, 15 लाखांचा "जुमला' कुणी दिला?, जवानांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त वक्तव्य कुणी केले? मुलींना पळवून आणून देतो, असे कोणता नेता म्हणाला? असे 56 प्रश्‍न विचारात प्रत्येक प्रश्‍नाला चार पर्याय दिले आहेत. 

आशिष शेलार वकील असल्याचे ऐकले होते. मात्र त्यांचे आजचे आरोप बघता असे वाटते की, ते फक्‍त दहावीपर्यंत शिकलेले असावेत आणि तेही कॉपी करून. 
- संदीप देशपांडे, मनसे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com