मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर नेहमी खड्डे कसे पडतात, असा सवाल करत हे खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे, अशा सूचना उच्च न्यायालयाने केल्या. पावसाळ्यात पडणारे खड्डे ही मोठी समस्या असल्याने या पाहणीसाठी मुंबई महापालिकेने पथक नेमावे. मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
उच्च न्यायालयाने याबाबत सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे, सामंजस्याने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, असे खंडपीठ म्हणाले. मुंबईतील खड्ड्यांविषयी तक्रार करण्यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करत मोबाईल ऍप सुरू केले होते. मात्र, सध्या हे ऍप बंद असल्याचे निदर्शनास आणताच खंडपीठाने महापालिकेच्या बेजबाबदारपणाबाबत नाराजी व्यक्त केली. रस्ते दुरुस्तीसाठी निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याचे खंडपीठाच्या लक्षात येताच पाहणीसाठी पथक नेमण्याच्या सूचनाही खंडपीठाने पालिकेला केल्या. रस्तेबांधणी आणि दुरुस्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणेचा अभ्यास करून त्यातील कुठले तंत्रज्ञान आपल्याला वापरता येईल, याविषयीची माहिती खंडपीठाला देण्याचे आदेश खंडपीठाने दिले. रात्री होणारे ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब करण्यात आली.
|