मोदीजी, अटलजींच्या काळात घालवलेली संधी तुमच्यासमोर आहे! : राज

raj-modi
raj-modi

मुंबई : 'अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एक संधी आली होती.. तीच संधी तुमच्यासमोर आहे', असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. 'युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर होऊ शकत नाही आणि त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही', असेही राज ठाकरे म्हणाले. 

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून 'जैश ए महंमद'चे प्रशिक्षण तळ उध्वस्त केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीमध्ये घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावर * अशी मोहीम सुरू झाली आहे. 

याच मोहीमेस राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांनी आज एक पत्रक प्रसिद्ध करून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

या पत्रकात राज ठाकरे म्हणतात, 'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'चर्चेतून' मार्ग काढण्याचे आवाहन केलेले माझ्या पाहण्यात आले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही त्यांनी अशाच प्रकारचे आवाहन केले होते. पुलवामा हल्ल्यापासून सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची तयारी खान यांनी दर्शविली आहे. अशा प्रकारे चर्चेतून समस्येवर तोडगा काढण्याची संधी अटलबिहारी वाजपेयी आणि परवेझ मुशर्रफ यांनाही होती. वाजपेयी यांनी 'सदा ए सरहद' ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली, समझोता एक्‍सप्रेस सुरू केली आणि आग्रा येथे ऐतिहासिक चर्चाही झाली. पण दुर्दैवाने या चर्चा पूर्णत्त्वास जाऊ शकल्या नाहीत. जी संधी वाजपेयींच्या काळात दोन्ही देशांच्या हातून निसटली, ती पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया ही दोन्ही कट्टर शत्रूराष्ट्रे चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात, तर आपण का नाही येऊ शकत?' 

सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या लष्करांच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर इम्रान खान यांनी काल चर्चेचे आवाहन केले होते. 

'युद्ध हे कोणत्याही प्रश्‍नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्‍मिरी जनताही भरडली जाईल. दहशतवाद्यांना ठेचलेच पाहिजेत. पण त्यामुळे युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून राजकीय फायदाही कुणी घेऊ नये. पाकिस्तानची चर्चेची तयारी असेल, तर पहिले पाऊल त्यांनीच उचलले पाहिजे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांनी तत्काळ सोडले पाहिजे आणि गोळीबारही थांबला पाहिजे. असे घडले, तरच इम्रान खान यांचा हेतू प्रामाणिक असल्याचे स्पष्ट होईल आणि तसे घडले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही संधी गमावू नये', असे राज यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com