"मोदीं'चा करिष्मा कायम 

Modi's aura continue
Modi's aura continue

स्थानिक उमेदवार शिवसेनेचे बलस्थान 
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट जाणवली होती. अडीच-तीन वर्षांनंतरही, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच करिष्मा काम करत असल्याचे चित्र दिसले, दुसरीकडे स्थानिक उमेदवार हे शिवसेनेचे बलस्थान ठरले. त्यांच्या जोरावरच शिवसेना महानगरपालिकेतील प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. या निवडणुकीत पैसा, जात, धर्म यापेक्षा प्रादेशिक अस्मिता, उमेदवाराची पार्श्‍वभूमी आणि पक्ष हे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरले. 
"सकाळ माध्यम समूहा'ने मुंबईतील सहा हजार 300 मतदारांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, तब्बल 78 टक्के मतदारांनी मुंबईत परिवर्तनासाठी मतदान केल्याचे सांगितले. त्यात 49 टक्के मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट झाले. भाजपला ज्यांनी मत दिले, त्यांच्यासाठी मोदी आणि फडणवीस यांचा चेहराच महत्त्वाचा ठरला; कारण त्यापैकी 45 टक्के मतदारांनी मोदींसाठी; तर 16 टक्के मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मतदान केले असल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. मोदींचा करिष्मा कायम असल्याचे दिसत असले, तरी मुंबईतील 31 टक्के मतदार असे होते, की त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मतदान केले होते; तर 9 टक्के मतदारांना शिवसेनेचा पराभव हवा होता. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई पिंजून काढली होती. तेच शिवसेनेचे मुख्य प्रचारक होते. मतदारांसाठी मात्र महत्त्वाचे ठरले ते उमेदवारांचे "स्थानिक'पण! शिवसेनेला मतदान करणाऱ्या 34 टक्के मतदारांनी शिवसेनेला केलेल्या मतदानामागे "स्थानिक उमेदवार' हे महत्त्वाचे ठरल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्यासाठी 29 टक्के मतदारांनी मतदान केल्याचे सांगितले; तर 72 टक्के मतदारांनी शिवसेनेला मतदान केले नसल्याचे सांगितले. 

निवडणुकीत पैशांचा पाऊस पडतो. जाती-धर्मावर मतदारांचे विभाजन होते असे मानले जाते; मात्र सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मतदारांनी या समजाला छेद दिला. केवळ एक टक्का मतदारांसाठी जात-धर्म आणि दोन टक्के मतदारांसाठी पैसा महत्त्वाचा ठरला. 43 टक्के मतदारांनी मात्र उमेदवाराची पार्श्‍वभूमी आणि 34 टक्के मतदारांनी पक्ष पाहून मतदान केले. यात पक्षनेतृत्व आणि पक्षाचा कार्यक्रमही फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. शिवसेनेने या निवडणुकीतही प्रादेशिक अस्मिता जागवली होती. त्याला मात्र मतदारांनी जोरदार पाठिंबा दिल्याचे दिसतेय. 55 टक्के मतदारांनी प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने मतदान केले. 

पारदर्शक ब्रह्मास्त्र 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सोडलेला पारदर्शकतेचा बाण भाजपसाठी ब्रह्मास्त्र ठरले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्के मतदारांनी पारदर्शकता हा मतदानावर प्रभाव टाकणारा मुद्दा असल्याचे कबूल केले; मात्र शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी उचलून धरलेला नोटाबंदीचा मुद्दा फारसा प्रभावी ठरला नाही. तब्बल 51 टक्के मतदारांनी नोटाबंदी हा मुद्दाच नसल्याचे सांगितले. 

शरद पवारांसाठीच... 
राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करणाऱ्या मतदारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठीच मतदान केल्याचे स्पष्ट होते. तब्बल 41 टक्के मतदारांनी शरद पवार यांच्यासाठी मतदान केले. मात्र, कॉंग्रेसला मतदान करणाऱ्या 58 टक्के मतदारांनी स्थानिक नेतृत्वाकडे बघून मतदान केले. त्यापैकी 30 टक्के मतदारांवर राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव दिसला. 


मनसेपेक्षा अपक्षच सरस 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 38 टक्के मतदारांनी अपक्ष उमेदवारांना पसंती दिली; तर 32 टक्के मतदारांनी मनसेला. यामुळे मनसेपेक्षा अपक्ष सरस ठरले आहेत. समाजवादी पक्षाला फक्त 8 टक्के आणि एमआयएमला 4 टक्के मतदारांनी प्राधान्य दिले. 

मशीन-घोटाळा नाही 
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर राज्यभरात इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनविरोधात आवाज उठू लागले. मुंबईतही या मशीनविरोधात राजकीय आंदोलन झाले होते; मात्र मतदारांनी ही शक्‍यता फेटाळून लावली. 60 टक्के मतदारांनी मशीनमध्ये घोटाळा नसल्याचा कौल दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com