मुंबई - मुंबईसह राज्यभरात मॉन्सून अखेर दाखल झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे मुंबईत मंगळवारी (ता. 25) काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार मॉन्सूनचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले; परंतु मुंबईत 10 वर्षांत दुसऱ्यांदा एवढ्या उशिराने मान्सून दाखल झाला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सून केरळमध्येच बराच काळ रेंगाळला. चक्रीवादळाचा प्रभाव 17 जूनला ओसरल्यानंतर दोन दिवसांनी मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यानंतर 20 जूनला दक्षिण कोकणात दाखल झालेला मॉन्सून मध्य महाराष्ट्रात पुढे सरकला. बंगालच्या उपसागरातील अनुकूल स्थितीमुळे तीन दिवसांनी त्याने मराठवाडा आणि विदर्भातील वाटचाल सुरू केली.
सोमवारी वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून मुंबई व राज्याच्या उर्वरित भागांकडे वळली. सोमवारी सकाळी काही ठिकाणी पावसाचा चांगला जोर होता. त्यानंतर मध्यरात्रीही पावसाने कृपा केली. दिवसभरात गोरेगावला 8 मिमी, माझगावला 10 मिमी, कांदिवलीत 14 मिमी आणि चारकोप येथे 16 मिमी पाऊस झाला. बोरिवलीत 25 मिमी, भांडुपमध्ये 36 मिमी, पवईत 44.6 मिमी, मुलुंडमध्ये 45.2 मिमी, तर आकुर्लीत 87 मिमी पावसाची नोंद झाली.
|