मुंबई : प्रकाश महेता, विनोद तावडे आणि राज पुरोहित या मुंबईतील ज्येष्ठ आमदारांचे तिकीट कापल्याने आता मुंबई भाजपचा पहिला बाक रिकामा झाला आहे. त्यात, महेता आणि पुरोहित हे दोघे मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. आता, माजी अध्यक्ष म्हणून फक्त आशीष शेलार मैदानात आहेत. या तिघांचे तिकीट कापल्याने मुंबईतील मंत्रिपदाचे दावेदारच कमी झाले आहेत.
पुरोहित मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष होते; तर तावडे यांनी राज्याच्या समितीतही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. तावडे यांच्याकडे 2014 मध्ये महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली नव्हती. नंतर त्यांची जबाबदारी कमी करण्यात आली. तर, महेता यांना मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: इच्छुक नव्हते. पण, दिल्लीतून वजन आल्याने त्यांना गृहनिर्माणमंत्रिपद मिळाले होते. पण, एसआरए घोटाळ्याच्या कारणाने त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आले.
तावडे यांच्या जागी सुनील राणे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 2014 मध्ये वरळीतून निवडणूक लढवली होती. त्यांच्या शैक्षणिक संस्था असून अनेक व्यवसायही आहेत. तर, महेता यांच्या जागी नगरसेवक पराग शहा हे पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. पराग शहा यांना महेता यांनीच राजकरणात आणले होते. 2017 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक लढले होते.
कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांच्या जागी भाजपने ऍड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. ऍड. राहुल यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना तत्काळ भाजपने एबी अर्ज दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रामराजे निबांळकर हे नार्वेकर यांचे सासरे आहेत. नार्वेकर यांचे बंधू ऍड. मकरंद आणि वहिनी हर्षिता भाजपच्या नगरसेविका आहेत. राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. ते शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जात होते. राज पुरोहित हे 1995 च्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
|