मुंबई - मुंबई व दिल्लीत नेमके किती खड्डे आहेत, त्याची माहिती सादर करण्याचे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. हे खड्डे मोजायला आणखी किती वेळ लागेल, असे न्यायालयाने सरकारला खडसावले.
"खड्ड्यांची संख्या प्रचंड आहे असे दिसते. त्याचमुळे यंत्रणेला ते मोजायला वेळ लागतोय का? देशाच्या राजधानीत आणि आर्थिक राजधानीत अशी अवस्था का येते,' अशा शब्दांत न्यायालयाने संबंधितांना फटकारले.
2016 मध्ये रस्ते अपघातात एक लाख 60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातलगांना तसेच अन्य अपघातग्रस्तांना मदत देण्याबाबात काय उपाययोजना केल्या, असा खडा सवालही न्यायालयाने केला. यासंदर्भात शक्य तेवढ्या लवकर तपशील सादर करू, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. देशात व महाराष्ट्रातही अनेक अपघात खड्ड्यांमुळेच झाले आहेत.
अपघातांची दखल
मुंबई व परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात दुचाकीस्वार पडल्याने जीवघेणे अपघात झाले. एक पादचारीही खड्ड्यात पडल्यावर ट्रकखाली येऊन ठार झाला. याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.
|