मुंबई - पवईच्या आयआयटी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने पवई तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. घरातल्यांसोबत वारंवार होत असलेल्या भांडणाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पवईच्या नामांकित शाळेत दहावी इयत्तेत ही मुलगी शिक्षण घेत होती.
अभ्यासावरून मुलीचे घरातल्यांसोबत वारंवार वाद व्हायचे. शनिवारी मोबाईलवर खेळत असताना तिच्यावर पालक ओरडले. याचा राग आल्याने तिने शनिवारी रात्री पवई तलावात उडी टाकून आत्महत्या केली, तर दुसरीकडे रागात घरातून निघून गेलेली मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिचे कुटुंबीय सर्वत्र तिचा शोध घेत होते. याबाबत त्यांनी पवई पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, रविवारी पवई तलावात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातर्फे पवई पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता, तो याच मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत मृतदेह विच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
|