पेण - मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण न झाल्याने पेणमधील हमरापूर फाट्याजवळ वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
उन्हाळी सुटीचा हंगाम आणि लग्नसराईनिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच अलिबाग, मुरुड-जंजिरा, गणपतीपुळे आदी कोकणातील पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूरदरम्यान चौपदरीकरणाचे काम मागील सात वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी अर्धवट झालेल्या रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
सध्या कोकणात जाणाऱ्यांची संख्याही वाढलेली असल्याने या महामार्गावरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. महामार्गावर पेणजवळ जिते, हमरापूर, तरणखोप, रामवाडी, उचेडे, वडखळपर्यंत पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रविवारी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीमुळे अनेक वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले.
|