मुंबई - मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर, जलद आणि स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा जलमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत जलवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारने मुंबई-गोवा जलवाहतुकीस 1 डिसेंबर 2016 रोजी परवानगी दिली आहे. त्यानंतर गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई-गोवा मार्गावरून वाहतूक सेवेचा धूमधडाक्यात प्रारंभ करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जलवाहतुकीचा मुंबई ते गोवा संभाव्य तिकीट दर 900 रुपये असेल असे समजते. केंद्र सरकारतर्फे देशात जलवाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते व रेल्वे मार्गांच्या तुलनेत जलवाहतूक पर्यावरणपूरक आहे. त्यामुळेच केद्र सरकारने "सागरमाला' प्रकल्पाची घोषणा केली. याअंर्तगत मुंबई-गोवा मार्गावरील जेट्टींचे काम पूर्ण केले जात आहे. मुंबई-गोवा जलमार्ग हा केंद्रासह राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो.
महत्त्वाचे थांबे
- मुंबईत भाऊचा धक्का
- दिघी
- दाभोळ
ृ- रत्नागिरी
- विजयदुर्ग
- देवगड,
- पणजी
प्रवास होणार सुखकर
- कोकण पर्यटनाला चालना
- मालवाहतुकीला वेग
- मुंबई-गोवा महामार्गावरील ताण कमी होणार
किल्लेदर्शन घडणार
गेट वे ऑफ इंडिया, जंजिरा, रेवदंडा, जयगड, पूर्णगड, विजयदुर्ग, मालवण, गोपाळगड यांसारख्या सागरी किल्ल्यांची भ्रमंती पर्यटकांना करता येणार आहे.
|