मुंबई - सांताच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. त्याच्या भूमिकेत आपण सर्वांनी शिरायला हवे आणि समाज बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी (ता. 25) येथे केले.
व्हीजेटीआयच्या टेक्नोव्हान्झा या महोत्सवाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. भारताचे जगातील स्थान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची प्रतिमा याबद्दल प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना भारतासमोरील आव्हाने लक्षात घ्या, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. जागतिक लोकसंख्येत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित नैसर्गिक स्रोत या दोन महत्त्वाच्या समस्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आहेत. या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीनेच उपाय शोधता येऊ शकतात. लोकसंख्येची अफाट वाढ आणि मर्यादित नैसर्गिक स्रोत यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक विषयांवर नवनवीन उपक्रम राबवायला हवेत. त्यासाठी नैसर्गिक स्रोत सुयोग्य ठेवल्यास माणसाची जीवनशैलीही चांगली राहील. शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी याला प्राधान्य द्या. भारत आर्थिक महासत्तेच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर आहे. 10 वर्षांत भारताची आर्थिकवृद्धी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
टेक्नोव्हान्झामध्ये आज
टॅक्नोव्हान्झाची धम्माल गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे. मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शाह, मुंबईच्या डबेवाल्यांवर पीएच.डी. करणारे डॉ. पवन अग्रवाल, नासाचे कन्सल्टंट डॉ. हेन्री थ्रूप टॅक्नोवान्झाला भेट देतील. हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्रावर पीएच.डी. करणारे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी मंगळवारी (ता. 25) व्याख्यान देतील.
|