दहावीच्या परीक्षेत 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा एक टक्क्याने घटली आहे. यंदा मुंबईचा निकाल 90.9 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो 91.90 टक्के होता.
निकालाचा टक्का घसरल्याचे खापर मुंबई विभागीय मंडळाने पुनर्परीक्षार्थ्यांवर फोडले आहे. अन्य विभागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या; तसेच पुनर्परिक्षार्थींचे जास्त प्रमाण, यामुळेच निकालाचा टक्का घसरल्याचा दावा मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी केला. यंदा अंदाजे 20 हजार विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली होती.
दरम्यान, शिक्षण विभागाने मार्च महिन्यात काढलेल्या आदेशानुसार कलेत नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार क्रीडा विषयांत 457, तर कला विषयात 16 हजार 938 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ झाला.
796 शाळांचा निकाल 100 टक्के
यंदा मुंबईतील 796 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या बाबतीत मुंबई विभागीय मंडळाने आघाडी मिळवली. मुंबईतील आठ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.
याबाबतही मुंबई विभागीय मंडळाचा राज्यात पहिला क्रमांक लागला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी शून्य टक्के निकाल लागलेल्या सर्व शाळा रात्रशाळा होत्या. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली असावी, अशी शक्यता जगताप यांनी व्यक्त केली. संबंधित शाळांवर कारवाई होणार नाही; मात्र या शाळांची मंडळाकडून तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले.
मुंबई विभागाची टक्केवारी
नोंदणी केलेले विद्यार्थी - 3 लाख 43 हजार 991
परीक्षा दिलेले विद्यार्थी - 3 लाख 42 हजार 973
उत्तीर्ण विद्यार्थी - 3 लाख 8 हजार 996
75 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी - 72 हजार 710
75 ते 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी - 1 लाख 4 हजार 999
60-45 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी - 98 हजार 610
45-35 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी - 32 हजार 677
|