मुंबई - क्रूझ पर्यटनाकरिता मुंबई पोर्ट ट्रस्ट 300 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल उभारत आहे. येत्या काही वर्षांत मुंबईत 80 टक्के क्रूझ दाखल होतील. त्यामुळे महसुलात वाढ होऊन सुमारे अडीच लाख तरुणांना नोकऱ्या मिळतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ आणि नौकायनमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. 8) येथे दिली.
"द डॉन ऑफ क्रूझ टुरिझम इन इंडिया'च्या परिसंवादात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, ""राज्य सरकारने जलवाहतुकीकरिता डीपीआर करावा, अशा सूचना मुख्य सचिवांना केल्या आहेत. देशात 12 मोठी आणि दोन हजार छोटी बंदरे आहेत. बंदरांसोबत नद्यांमध्ये जलवाहतूक प्रकल्प सुरू होत आहेत. "सागरमाला' प्रकल्पांतर्गत आतापर्यंत चार लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. बंदरांचा नफा वाढत आहे. क्रूझ पर्यटनाचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याने क्रूझ पर्यटनाला "अच्छे दिन' येणार आहेत. क्रूझ पर्यटनामुळे 35 हजार 500 कोटींचा महसूल अपेक्षित असून, अडीच लाख तरुणांना नोकऱ्या मिळतील.''
विमानतळाच्या धर्तीवर देशात जलवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता "रिव्हर ट्रॅफिक कंट्रोल' यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पर्यटन वाढवण्याकरिता राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी दिली.
गडकरींच्या कानपिचक्या
वांद्रे-वरळी सागरी सेतूचे काम सुरू असताना आपण मंत्री होतो. तेव्हा प्रकल्पाची किंमत कमी होती; मात्र आक्षेपामुळे प्रकल्पाला दिरंगाई होऊन त्याची किंमत चौदाशे कोटी इतकी झाली. प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम त्याच्या किमतीवर होतो. आम्ही पाच वर्षांकरिता असतो, तर अधिकारी 58 वर्षांपर्यंत सेवेत असतात, अशा कानपिचक्या नितीन गडकरींनी दिल्या.
|