मुंबई - आखाती देशात नोकरीचे स्वप्न पाहत उत्तर प्रदेशातून मुंबईला आलेल्या 30 जणांना तुरुंगाची हवा खावी लागली. बनावट तिकिटांप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फरारी तीन दलालांचा सहार पोलिस शोध घेत आहेत.
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये फरारी दलालाने कार्यालय थाटले होते. आखाती देशात जास्त पगाराची नोकरी देतो, अशी पत्रके त्यांनी वाटली होती. त्यानुसार 90 जणांनी संपर्क साधला. दलालाने काही जणांकडून एक ते दीड लाख रुपये घेतले होते. त्यांना बनावट पारपत्र आणि करारनामा दिला होता. शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी हे सर्व जण जोगेश्वरीतील एका हॉटेलमध्ये राहिले. शनिवारी (ता. 28) पहाटेचे विमान असल्याने 30 जण मुंबई विमानतळावर आले. पहिल्यांदाच विमानतळ पाहिल्याने ते गांगरले होते. तिथे "सीआयएसएफ'च्या अधिकाऱ्यांनी त्यांची तिकिटे पाहिली. अधिकाऱ्यांना ती बनावट असल्याचा संशय आला. त्यांनी सहार पोलिसांना कळवले. सहार पोलिस विमानतळावर गेले. त्या सर्वांना चौकशीकरिता पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच बाकीच्यांनी पळ काढला.
पोलिसांनी 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन दलाल फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
|