मुंबई - समाजाला विकासासाठी संधीची गरज असते. दारिद्रय निर्मूलनासाठी राज्याने "ऍक्शन रूम'ची स्थापना केली असून, याच माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये रोजगार आंदोलन निर्माण केले जाणार असल्याची घोषणा अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केली.
दारिद्रय निर्मूलनासाठी "ऍक्शन रूम'चे उद्घाटन संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रमुख युरी अफानासिएफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मुनगंटीवार बोलत होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
पर्यावरणाचे ज्यांनी रक्षण केले ते विकासात मागे राहिले आणि ज्यांनी पर्यावरणाचे शोषण केले ते विकासात पुढे गेले, यातून गरजेसाठी संघर्ष करणारा आणि हव्यासासाठी शोषण करणारा वर्ग निर्माण झाला.
विकासाची ही दरी सांधली नाही, तर भविष्यात रोजगारासह अनेक आव्हाने आपल्यासमोर उभी राहणार आहेत. त्यामुळे वेळीच पाऊल उचलून हे अंतर सांधण्याचे काम या "ऍक्शन रूम'मार्फत हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात 27 नक्षत्र असतात. 27 तालुक्यांचा विकास करून राज्यात 27 तालुका नक्षत्र तयार होतील, असेही मुनगंटीवार पुढे म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युरी यांनी राज्याने सुरू केलेल्या या ऍक्शन रूमचे कौतुक केले. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाचे संकल्प, उद्दिष्ट्ये निश्चित केली आहेत. त्याचा भारतासह जगातील देशांनी स्वीकार केला आहे. एकात्मिक विकासाबरोबर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात शाश्वत विकासाची समन्वयक दृष्टी डोळ्यासमोर ठेवून काम करताना दारिद्रय निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, लिंग समानता, पर्यावरणीयबदल आदी मुख्य विषयांची सर्व उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही युरी यांनी या वेळी सांगितले.
|