मुंबई - योजनेसाठी मंजूर झालेला निधी कोणत्याही कारणाने अन्य ठिकाणी वळवू नये अथवा खर्च करू नये. तो निधी खर्च केला तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्यास जबाबदार असलेला अधिकारी यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे.
नगरविकास विभागाकडून विविध योजना, उपक्रम यासाठी स्थानिक स्वराज संस्थांना निधी देण्यात येतो. हा निधी मंजूर असेल त्याच योजनेसाठी खर्च करणे बंधनकारक असताना तो अन्यत्र वळवला जातो. याबाबत वारंवार सूचना करूनही परिणाम होत नाही. नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
काही योजनांच्या निधीसाठी बॅंक खाते उघडण्याची तरतूद असताना हा निधी अन्य बॅंक खात्यात वर्ग करून खर्च केल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही योजनेचा निधी कोणत्याही महापालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायतींनी परस्पर वळवू नये. असे केल्यास ही गंभीर आर्थिक अनियमितता समजली जाईल, असे नगर विकास विभागाने म्हटले आहे. तसेच, कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
|