मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाही, त्यामुळे या निवडणुकीनंतर सावध राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या आमदारांना दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक राहण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
शिवसेना भवनमध्ये झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील विविध समस्यांचाही आढावा घेतला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर महापालिकांमध्ये गाफील राहू नका. भाजपला मुद्द्यांवरून उत्तर द्या, असा सल्ला त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपला शिवसेनेचा पाठिंबा आवश्यक आहे, त्यामुळे भाजप सध्या शिवसेनेला आक्रमक होऊन प्रत्युत्तर देत नाही; मात्र या निवडणुकीनंतर भाजप राज्यात आणि महापालिकांमध्ये शिवसेनेला अडचणीत आणू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
|