मुंबई - आधीच्या सरकारांना 66 वर्षांत जे जमले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांत केले. घराणेशाही, जातीयवाद, लांगूलचालन संपवून संसदीय आणि पक्षीय राजकारणात प्रभावी काम केले. हीच या देशातील लोकशाहीच्या परिवर्तनाची सुरवात आहे, असे गौरवोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी काढले.
"हमारे नरेंद्र भाई' पुस्तकाचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. हे पुस्तक मूळ गुजराती पुस्तकाचा हिंदी अनुवाद आहे. कॉंग्रेसच्या कारकिर्दीवर टीका करताना अमित शहा म्हणाले, की राजकारणात कुटुंब आणि व्यक्तीला महत्त्व होते. मात्र, मोदी यांनी "पार्टी' या शब्दाला लोकशाहीत महत्त्व मिळवून दिले. 12 कोटी कुटुंबांना शौचालये, नऊ कोटी कुटुंबांना गॅस, 2018 पर्यंत प्रत्येक गावात वीज, अशा घोषणा त्यांनी केल्या. हे पुस्तक कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, '2022 पर्यंत घर नसेल असे एकही कुटुंब देशात नसेल, असा सरकारचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातही 2020 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचा निर्धार आहे.''
या वेळी केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार आर. के. सिन्हा, मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड्. आशिष शेलार, ऍड्. एकनाथ बावनकर, किशोर मकवाना आदी उपस्थित होते.
|