भिवंडीतील रस्ते पाण्याखाली

भिवंडीतील रस्ते पाण्याखाली

भिवंडी - भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे शहर परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराला जोडणाऱ्या खाडीपार पुलावरून पाणी वाहू लागल्याने कांबे, काटई, जुनांदुर्खी अशा सहा गावांचा संपर्क तुटला आहे. पोलिस आणि पालिका प्रशासनाने खाडीपार पुलावरून नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. १७) सायंकाळी खाडीपार येथे पाण्यात पोहण्यासाठी उतरलेला २५ वर्षीय तरुण वाहून गेल्याने पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून १२ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने पॉवरलूम व्यापार-उद्योगासह इतर व्यवसाय ठप्प झाला आहे. तीनबत्ती, निजामपुरा, शिवाजीनगर, कारिवली रोड, जुना ठाणे रोड, गोपाळनगर, कल्याण रोड, खडक रोड, कणेरी, पद्मानगर आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाले-गटारांचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने पद्मानगर व शिवाजीनगर भाजी मार्केटमध्ये सर्वत्र चिखल झाला आहे. पावसामुळे प्रमुख रस्त्यांसह अनेक ठिकाणचे सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. 

महामार्गांवर वाहतूक कोंडी
पावसामुळे रस्त्यावर वाहतूक पोलिस नसल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबई-नाशिक, भिवंडी-वाडा, भिवंडी-ठाणे या महामार्गावरील सखल भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे शांतीनगर, कामतघर, ताडाळी रोड, मानसरोवर, अशोकनगर, भैयासाहेब आंबेडकरनगर, कचेरीपाडा, दरगाह रोड आदी ठिकाणी रस्त्याजवळची झाडे पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com