भाजपमध्ये चिंतेचे वातावरण 

भाजपमध्ये चिंतेचे वातावरण 

मुंबई - पूर्वीचा जनसंघ आणि आताच्या भाजपची दलितविरोधी प्रतिमा पुसून काढण्याचे प्रयत्न पक्षाच्या नेत्यांकडून होत असताना कोरेगाव भीमामधील घटनेमुळे पक्षात पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. या हिंसाचारानंतर काही संघटनांनी पुकारलेल्या बंदला अनेक तास उलटल्यानंतरही भाजपच्या गोटात शांतता आहे. या घटनेबाबत पक्षाचा एकही नेता पुढे येऊन एखादे विधान करण्यास धजावत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

राज्यात काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे जातीय तणाव निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांचे या सर्व घटनांकडे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी निघालेल्या मराठा मोर्चात भाजपचे सर्व आमदार सहभागी झाले होते. त्याबाबत भाजपने अत्यंत खुली भूमिका घेतली होती; पण कोरेगाव भीमामधील घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, पक्षाने सध्या शांत राहणेच पसंत केले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन, तसेच कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संसदेत बाजू मांडताना विकासाला विरोध करणाऱ्या मंडळींनी केलेला हा बंद आहे, असे नमूद केले. प्रदेशाध्यक्ष दिल्लीत व मुख्यमंत्री कामकाजात व्यग्र, असे चित्र असल्याने सामान्य भाजप कार्यकर्तेही सध्या या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. 

दलित नेत्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा 
कोरेगाव भीमामधील घटनेसंदर्भात विविध आंबेडकरी संघटनांच्या नेत्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीच्या अहवालातील शिफारशी स्वीकारल्या जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com