मुंबई - शालेय शिक्षण विभागाने "अवांतर वाचन' या उपक्रमांतर्गत निवडलेल्या पुस्तकांमध्ये कोणताही आक्षेपार्ह मजकूर नाही. विरोधकांना सरकारविरुद्ध केवळ खोटेनाटे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करायची सवयच झाली आहे, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना तावडे यांनी सर्वच आरोप निरर्थक असल्याचे सांगितले. एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गतही पाचवीपर्यंतच्या पुस्तकांच्या निवडीत पंतप्रधान मोदी यांच्या चरित्रावरील पुस्तकांवर अधिक खर्च झाल्याच्या आरोपावरून तावडे यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. मात्र, या योजनेंतर्गतही केवळ मोदींचीच पुस्तके खरेदी केल्याचा विरोधकांचा दावा निरर्थक आहे, असे तावडे म्हणाले.
समितीने निवडलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तीन लाख 50 हजार पुस्तके, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील प्रत्येकी 2 लाख पुस्तके, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांच्यासह संत कबीर, संत मीराबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदींच्याही पुस्तकांचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याच पुस्तकांची खरेदी झाल्याचा दावा निराधार आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांसह अवांतर वाचनअंतर्गत शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळी पुस्तके खरेदी केली जातात. यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या पुस्तकांमध्ये संतकथा आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील पुस्तकांचाही समावेश आहे. धार्मिक व पौराणिक पुस्तकेही निवडण्यात आली आहेत, असेही तावडे म्हणाले.
|