मुंबई - कोल्हापूरमधील प्रदूषणाचा त्रास होत असल्याने आपल्याला मुंबई-पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश द्यावा, ही एका विद्यार्थिनीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली आहे. मुंबई-पुण्यापेक्षा कोल्हापूर कमी प्रदूषित आहे, त्यामुळे तिथेच शिक्षण पूर्ण करावे, असा सल्लाही न्यायालयाने दिला.
दम्याचा आजार असलेली ही विद्यार्थिनी वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकत आहे. तिने न्यायालयात याचिका दाखल केली होती. दम्याच्या आजारामुळे कोल्हापूरमधील प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातील एखाद्या महाविद्यालयात प्रवेश द्यावा, अशी तिची मागणी होती. या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. याचिकादार विद्यार्थिनीचा वैद्यकीय प्रवेश यादीमधील क्रमांक 37 वा आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात ती सध्या कोल्हापूरमध्ये शिकत आहे; मात्र तब्येतीच्या कारणावरून मुंबई-पुण्यातील पाच महाविद्यालयांची नावे तिने वैद्यकीय संचालकांना सुचवली होती. त्यापैकी एका महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी केली होती; मात्र ती मान्य होऊ शकत नाही, असे संचालकांनी कळवले होते. त्यामुळे विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रतीक्षा यादीत तिचा क्रमांक 37 वा होता. रिकाम्या जागा केवळ नऊ होत्या. त्यामुळे गुणवत्ता यादीनुसार विचार करता तिची मागणी पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे संचालकांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. खंडपीठाने याबाबत सहमती व्यक्त केली.
पुणे आणि कोल्हापूरचे वातावरण तुलनेने सारखेच वाटते; मात्र कोल्हापूरपेक्षा पुणे अधिक प्रदूषणकारी आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मुंबई शहर आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे दमा असलेल्या व्यक्तीसाठी कमी प्रदूषण असणेच हितकारक ठरू शकते, असा सल्लाही खंडपीठाने दिला आणि संचालकांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
|