मुंबई - 'राज्यातील सरकार अकार्यक्षमच नव्हे तर संपूर्णपणे निर्दयी असून कर्जमाफी प्रक्रियेचा बोजवारा उडालेला पाहता शेतक-यांची टिंगल करायचा या सरकारचा मानस दिसतो. शेतक-यांना मारण्याचा विडाच या सरकारने उचलला आहे,'' अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारचे धोरण पूर्णपणे असंवेदनशील आहे.
एकूण कर्जमाफीची प्रक्रिया ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा ह्या दृष्टीकोनातून नव्हे तर शेतकऱ्यांवर आम्ही उपकार करत आहोत या उद्द्येशाने कमीत कमी खर्च कसा व्हावा या दृष्टीकोनातून पार पाडली जात आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांची बुद्धी ही खोटे युक्तीवाद करून आपल्या सरकारची अकार्यक्षमता झाकण्याकरिताच खर्ची पडत आहे. यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी खोटेपणा टाळून प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपली बुद्धीमत्ता वापरली असती तर बरे झाले असते, असा टोला सावंत यांनी लगावला.
|