मुंबई - अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नेमका काय विचार करतात, काय वाचतात, त्यांना कसे सुचते, असे नानाविविध प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात; पण संमेलनाच्या धामधुमीत ते प्रश्न अध्यक्षांपर्यंत पोचत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन यंदा पहिल्यांदाच साहित्य संमेलनाध्यक्षांबरोबर संवाद साधण्याची सर्वसामान्यांना संधी मिळणार आहे.
बडोदा येथे फेब्रुवारीमध्ये 91वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. माजी सनदी अधिकारी आणि साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यंदाचे संमेलनाध्यक्ष आहेत. त्यांच्यासह संमेलनातील मान्यवरांशी गप्पा मारण्याची, त्यांचे अनुभव आणि विचार ऐकण्याची सर्वसामान्यांची इच्छा यंदा पूर्ण होणार आहे. त्यासाठी विशेष सत्र ठेवण्याचा विचार आयोजकांचा सुरू आहे. त्याला संमेलनाध्यक्षांनीही होकार दिला आहे.
साहित्यिक वाचकांसाठी साहित्यनिर्मिती करतात; परंतु या वाचकांना साहित्य संमेलनात औपचारिकपणा, वाचकांचा भिडस्तपणा यामुळे संवाद होत नाही. यंदा साहित्य संमेलनात सर्वसामान्य माणसांना संमेलनाध्यक्षांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी वेळ राखून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक आनंद आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्ष
|