मुंबई - इस्राईल आणि भारत यांच्या कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या परिषदेत ते बोलत होते.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे या परिषदेत उपस्थित होते. भारत व इस्राईल हे सर्वांत चांगले भागीदार बनू शकतात, असा विश्वास नेतान्याहू यांनी व्यक्त केला. यानंतर बोलताना फडणवीस यांनी येथील ज्यू समाजाने राज्याच्या प्रगतीस हातभार लावल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड तयार करण्यासाठी इस्राईलबरोबर होत असलेल्या कराराचा उल्लेखही फडणवीस यांनी केला. ""इस्राईलचे तंत्रज्ञान व अनुभव यामुळे राज्याला सर्वोत्तम व मोठे वॉटरग्रीड मिळेल.
उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील राज्याच्या प्रगतीचा आलेख चांगला आहे. इस्राईलच्या उद्योजकांसाठी महाराष्ट्र अत्यंत योग्य आहे. येथे तंत्रज्ञान आणि कृषी उद्योगांना मोठा वाव आहे,'' असे फडणवीस म्हणाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या ज्यू नागरिकांना श्रद्धांजली वाहतानाच हे दोन देश एकत्र आले तर जागतिक दहशतवादाविरोधातील लढा तीव्र होईल, असा उल्लेखही त्यांनी केला.
उद्योजकांशी चर्चा
नेतान्याहू यांनी आज ताज हॉटेलात अजय पिरामल, राहुल बजाज, आदी गोदरेज, हर्ष गोएंका, आनंद महिंद्र, दिलीप संघवी, अशोक हिंदुजा, चंदा कोचर आदी व्यावसायिकांबरोबर चर्चा केली. नेतान्याहू यांच्याबरोबर सुमारे शंभर इस्रायली उद्योगांचे 130 सदस्यांचे शिष्टमंडळही आले आहे.
|