मुंबई - शेतकरी मागण्यांपुढे नमलेल्या सरकारने तत्वतः कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व राजकीय पक्षामध्ये श्रेयासाठी सध्या लढाई सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नगर जिल्हयातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या गटाने शेतकरी संपाची घोषणा केली. त्यानंतर या शेतकरी संपाचे लोण राज्यभर पसरले.
सुरवातील ताठर भूमिका घेणाऱ्या सरकारने यानंतर संपाची झळ बसू लागताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. यानंतर याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ लागली आहे. सत्ताधारी भाजपाने काही दिवसांपूर्वीच शहरांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारे फलक लावले आहेत. सत्तेतील सहभागी शिवसेनेने याचे श्रेय घेतले आहे."आमच्या बडग्यामुळेच सरकारला कर्ज माफी करावी लागली' असे म्हटले आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या घोषणेचे श्रेय घेताना "आम्ही काढलेल्या संघर्ष यात्रेमुळेच सरकारवर दबाव येउन ही कर्जमाफी केली आहे' असे म्हटले आहे. आमदार बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी श्रेय घेताना आम्ही काढलेल्या अनुक्रमे आसूड आणि आत्मक्लेश यात्रांमुळे सरकारला नमते घ्यावे लागले असे म्हटले आहे.
|