मुंबई - पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली असून, महाराष्ट्राच्या वनविकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत "संत तुकाराम वनग्राम' पुरस्कारांचे वितरण; तसेच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर आदी उपस्थित होते. मुनगंटीवार यांच्या दमदार नेतृत्वाखाली वन विभागाने मागील तीन वर्षांत लक्षणीय काम केल्याने महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर पहिल्या स्थानावर आहे, हे जंगल, हे वन आपले आहे, ही भावना लोकमनात निर्माण करण्यात वन विभाग यशस्वी ठरला. यासाठी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या अभिनंदनास पात्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
संत तुकाराम वनग्राम योजनेतील पुरस्कारप्राप्त संयुक्त वन व्यवस्थापन समित्या
प्रथम पारितोषिक विभागून -
- लांबोटा संयुक्त वन व्यवस्थापन समिती (ता. निलंगा, जि. लातूर, वन वृत्त, औरंगाबाद)
- काचुर्ली संयुक्त वन व्यवस्थापन समिती (ता. त्र्यंबक, जि. नाशिक)
द्वितीय पारितोषिक विभागून -
- खांडगेदरा संयुक्त वन व्यवस्थापन समिती (ता, संगमनेर, जि. नगर- वनवृत्त नाशिक)
- उथळपेठ संयुक्त वन व्यवस्थापन समिती (ता. मूल, जि. चंद्रपूर- वनवृत्त चंद्रपूर)
- चिट्टूर संयुक्त वन व्यवस्थापन समिती (ता. सिरोंचा, जि. गडचिरोली - वनवृत्त गडचिरोली)
तृतीय पारितोषिक विभागून
- हिवरे संयुक्त वन व्यवस्थापन समिती (ता. कोरेगाव, जि. सातरा- वनवृत्त कोल्हापूर)
- पाल संयुक्त वन व्यवस्थापन समिती (ता. रावेर, जि. जळगाव - वनवृत्त धुळे)
मराठवाडा प्रशासकीय विभागाचे बक्षीस
- कात्री संयुक्त वन व्यवस्थान समिती (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद -वनवृत्त औरंगाबाद)
|