मुंबई - शिक्षक मतदार याद्यांची फेररचना आणि बूथ लेव्हल ऑफिसरच्या (बीएलओ) कामातून सुटका व्हावी, यासाठी शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी मंगळवारी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची सुटका करा, अशी मागणी केली.
निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एन. एन. भुटोलिया आणि के. एफ. विल्फ्रेड यांची पाटील यांनी भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. शिक्षकांना या कामांतून मुक्त करण्याचे निर्देश राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना दोन दिवसांत दिले जातील, असे आश्वासन या वेळी भुटोलिया यांनी दिले. शाळांमध्ये दहावीच्या पुनर्परीक्षेचे काम सुरू असताना शिक्षकांना निवडणुकीच्या कामाची जबाबदारी देण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील बहुतांश शाळांतील दहावीचे शिक्षक सध्या अशैक्षणिक कामात भरडले गेले आहेत. शिक्षकांना अशी कामे देऊ नयेत, अशी वारंवार विनंती करूनही हा प्रकार सुरूच असल्याने शिक्षक भारतीने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.
सध्या शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा, विविध कार्यक्रम, सहलींचे नियोजन सुरू आहे. दक्षिण मुंबईत सरकारी कार्यालये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या भागांत सरकारी कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. हा मुद्दा शिक्षक भारतीने दिल्लीत झालेल्या चर्चेवेळी मांडला.
|