मुंबई - मंडयांमधील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प मुंबई महापालिका सुरू करणार आहे. सुरवातीला चार मंडयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका पाच वर्षांकरिता या प्रकल्पासाठी 8 कोटी 35 लाख रुपये खर्च करणार आहे. हे खत कंत्राटदार विकणार असून, त्या बदल्यात तो महापालिकेला प्रतिमहिना 40 हजार रुपये देणार आहे.
पालिकेच्या मंडयांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलून तो डंपिंग मैदानावर टाकला जातो; मात्र आता कचऱ्याचे हे प्रमाण कमी करण्यासाठी 91 मंडयांपैकी 52 मंडयांमध्ये खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चार मंडयांसाठी हे कंत्राट देण्यात येणार आहे. के. के. ब्रदर्स या कंत्राटदाराने आठ कोटी 59 लाख रुपये खर्च करून प्रकल्प उभारण्याची तयारी दाखवली होती; मात्र, खतविक्रीतील हिस्सा म्हणून पालिकेला 40 हजार रुपये देण्यात येणार असून, हा प्रकल्प आता आठ कोटी 35 लाख रुपयांत उभारण्यात येणार आहे.
अशी होणार खतनिर्मिती
- ओला कचरा वेगळा करून त्याचे बारीक तुकडे करण्यात येतील
- या तुकड्यांमधील पाण्याचा अंश कमी करण्यात येईल
- ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर मशीनद्वारे 24 तास विघटन करण्यात येईल
या मंडयांमध्ये होणार प्रकल्प
- क्रांतिसिंह नाना पाटील मंडई, दादर- दररोज 20 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया
- स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई, दादर- दररोज 2.5 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया
- साईनाथ मंडई, मालाड- दिवसाला 2.5 मेट्रिक टन कचरा
- बोरिवली मंडई- दररोज 2.5 मेट्रिक टन कचरा
|