मुंबई - पोलिसांकडील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होत असल्याचे निदर्शनास येते. बालकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी 2012 मध्ये बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. तरीही अत्याचारांचे प्रमाण वाढतच आहे.
लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे गुन्हे यापूर्वी भारतीय दंड विधानाच्या कलमांनुसार दाखल करण्यात येत होते; परंतु अत्याचाराचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये सुरू करण्यात आली. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची आणि खटला लवकर निकाली काढण्याची तरतूद कायद्यातच आहे. हा कायदा कडक असल्यामुळे आरोपीला जामीन मिळणेही कठीण जाते.
खटल्याच्या कामकाजामुळे पीडित मुले घाबरून जाऊ नयेत, याचीही दक्षता या कायद्यात घेण्यात आली आहे. कोर्ट रूममध्ये आरोपी आणि पीडित बालकांमध्ये पडदा ठेवण्यात येतो. बालकाला आरोपीसमोर आणले जात नाही. सुनावणीदरम्यान पीडित बालकाचे पालक वगळता इतर कोणालाही न्यायालयात उपस्थित राहता येत नाही. बालकांच्या मानसिकतेवर न्यायालयीन कामकाजाचा परिणाम होणार नाही याची दक्षता कशी घ्यावी, याची तरतूदही कायद्यात आहे. या कायद्यानुसार पीडित मुला-मुलींचा जबाब साध्या वेशातील पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन नोंदवणे आवश्यक असते. मुलीची वैद्यकीय तपासणी महिला डॉक्टरच्या उपस्थितीत करण्याची आणि मुलांची तपासणी करताना पालकांची उपस्थिती बंधनकारक आहे.
अल्पवयीन मुलींवरील बलात्कार (मुंबई) - 251
जानेवारी ते जुलै 2017 दरम्यानचे गुन्हे - 252
जानेवारी ते जुलै 2017 दरम्यानचे गुन्हे
50 टक्के - बालकांवर लैंगिक अत्याचार
(संदर्भ - महिला व बालकल्याण विभाग, युनिसेफ-प्रयास संस्था)
94.8 टक्के - आरोपी अल्पवयीन मुलांच्या परिचयाचे
(संदर्भ - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो)
अत्याचाराचा चढता आलेख
वर्ष................................. गुन्हे
2014 ....................... 8904
2015........................ 14913
(संदर्भ ः नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो)
लैंगिक अत्याचार
- मध्य प्रदेशात सर्वाधिक
- महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
अत्याचाराचा बळी
लैंगिक अत्याचार असह्य झाल्याने पवई मोरारजीनगर परिसरातील गौतमनगर येथे दोन अल्पवयीन मुलांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यापैकी 10 वर्षीय मुलाचा 12 जुलै 2017 ला मृत्यू झाला; तर 13 वर्षांच्या मुलावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. कीटकनाशकामुळे त्याचे यकृत निकामी झाले. हा मुलगा शुद्धीवर आल्यानंतर त्याने आपली करुण कहाणी कथन केली. आरोपीने पाणी पाजण्याच्या बहाण्याने त्याला बाहेर नेऊन त्याच्यावर अत्याचार केले.
|