मुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये आग लागून तीन महिने उलटल्यानंतरही राज्य सरकार चौकशी समिती नेमण्याबाबत चालढकल करत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली.
या आगीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ज्युलिओ रिबेरो यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. शंतनू केमकर आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आग लागून एवढे दिवस उलटल्यानंतरही सरकारने चौकशी समिती नेमलेली नाही.
म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या धोरण बदलांमुळे गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध नाही, असे या वेळी सांगण्यात आले; मात्र गिरणी कामगार आणि आगीच्या घटनेचा काय संबंध आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. आगीची चौकशी करण्यासाठी समिती नेमणे आवश्यक आहे, त्याचे काय झाले, सरकारकडून याबाबत वेळकाढूपणा होत आहे, असेही खंडपीठाने सुनावले.
|