मुंबई - मुंबईच्या कमला मिल परिसरातील हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींबद्दल संवेदना व्यक्त करतानाच महापालिका आणि राज्य सरकारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारामुळेच अशा घटना वारंवार होत असल्याचे ते म्हणाले.
कमला मिल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे आहेत. फायरच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. अवैध वाहनतळासाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केली जात आहे.
याबाबत मी महापालिका आणि सरकारकडे वारंवार तक्रारी करून त्याची दखल घेतली गेली नाही. आपण केलेल्या सर्व तक्रारींचे आपल्याकडे पुरावेही आहेत. महापालिका आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच अशा नियमबाह्य कामांकडे दुर्लक्ष होऊन अशा घटना घडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत "नाईट लाइफ' सुरू करू इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांचे जीवन त्यांच्या ताब्यातील भ्रष्ट संस्थांमुळे किती धोकादायक आहे, याची प्रचिती या दुर्घटनेमुळे आली असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात एकाच महिन्यात अशा प्रकारच्या तीन दुर्घटना घडल्याचे मुंडे यांनी सांगितले.
|