नवी मुंबई राज्याच्या स्वच्छतेचा आरसा - महापौर

नवी मुंबई राज्याच्या स्वच्छतेचा आरसा - महापौर

नवी मुंबई - नवी मुंबई शहराला राज्याच्या स्वच्छतेचा आरसा म्हणून पाहिले जात असल्याने आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. प्रत्येकाने मनाशी ठरवून स्वच्छता केली तर नवी मुंबई यंदा बाजी मारेल, असा विश्‍वास महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केला.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या सोसायट्या व हॉटेल्समधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात केले होते. त्यात मार्गदर्शन करताना सोनवणे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

नवी मुंबई शहराची स्पर्धा देशातील चार हजार शहरांसोबत असून, या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरातून कचरा गायब करण्यासाठी महापालिका शून्य कचरा ही संकल्पना राबवत आहे. घरातील कचरा घरात अथवा सोसायटीच्या आवारात नष्ट करणे ही अवघड प्रक्रिया नाही. याकरिता कंपोस्ट बास्केटचा वापर करून घरात अथवा कंपोस्ट युनिटच्या मदतीने सोसायटीच्या आवारात खतनिर्मिती करणे सहज सोपे असल्याचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले. नागरिकांनी स्वच्छता ही नियमित सवय लावून घेतल्यास नवी मुंबई देशात पहिला क्रमांक पटकावेल, असे रामास्वामी यांनी सांगितले. नवी मुंबई शहराने अनेकदा आपला वेगळेपणा जपलेला आहे. कचऱ्याचे पर्यावरणावर घातक परिणाम होत असून, वर्गीकरण व कचऱ्याची विल्हेवाट लावून देशात पहिला क्रमांक पटकावण्यासाठी वेगळेपणा जपण्याची आपल्यावर जबाबदारी आली आहे. ती पूर्ण पार पाडू, असे आश्‍वासन या वेळी नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी केले. नवी मुंबई शहरात देशात पहिले येण्याची क्षमता असून, प्रत्येकाने दृढनिश्‍चय केल्यास नवी मुंबई शहर नक्कीच पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेत प्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्ट जयंत जोशी यांनी स्वच्छतेचे प्रात्यक्षिक दाखवले. सर्वांना बदल हवा आहे; पण तो आपल्यापासून नकोय. प्रत्येकाने मानसिकता बदलली तर स्वच्छता शक्‍य आहे, असे जोशी यांनी सांगितले.

हॉटेलमालकांचा सहभाग
विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात हॉटेल्सचे मालक, चालक, कर्मचारी व मोठ्या सोसायट्यांचे पदाधिकाऱ्यांसह नागरिक व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेनंतर नाट्यगृहाच्या आवारात सेंद्रिय पद्धतीने खतनिर्मिती करण्यासाठी कंपोस्ट बास्केट उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच शंभर किलोपेक्षा अधिक गोळा होणारा कचरा विल्हेवाट लावण्यासाठी आवश्‍यक असणारा कंपोस्ट युनिटचे नमुने ठेवण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com