मुंबई - फेरीवाल्यांविरोधात मनसेने पुन्हा मोहीम उघडली आहे. "ना फेरीवाला' क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे पत्र मनसेने मुंबईतील पोलिस ठाण्यांत आणि महापालिका कार्यालयात दिले आहे. त्यामुळे पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाणे, रेल्वेचे स्टेशन मास्तर आणि महापालिका अधिकाऱ्यांना पत्र देण्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला होता. या घोषणेला एक महिना उलटून गेल्यानंतर बुधवारी बोरिवली परिसरातून असे पत्र देण्यास मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरवात केली आहे. मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांनी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, बोरिवली रेल्वे स्टेशन मास्टर आणि पालिकेच्या "आर' प्रभाग कार्यालयात राज ठाकरे यांच्या पत्रासह न्यायालयाच्या निकालाची प्रत दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकाचा 150 मीटरचा परिसर "ना फेरीवाला क्षेत्र' म्हणून कायम ठेवला आहे.
|