राज्यात तळीराम वाहनचालकांच्या संख्येत सातत्याने वाढ
मुंबई - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या राज्यात वाढते आहे. राज्यात 2016 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत अशा एक लाख 36 हजार प्रकरणांची नोंद झाली असून, उपराजधानी नागपूर त्यात आघाडीवर आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात 2016 पासून 35 हजार 274 प्रकरणांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात 26 हजार 746 आणि पुणे शहरात 24 हजार 360 प्रकरणे दाखल आहेत. अन्य जिल्ह्यांत पुणे ग्रामीण, नागपूर ग्रामीण, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, नवी मुंबई, सांगली ग्रामीण, सोलापूर ग्रामीण यांचा समावेश आहे.
तळीरामांवर केलेल्या कारवाईत 16 कोटी 47 लाख 57 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागांबरोबरच महामार्गावरही बॅनर, होर्डिंग लावून याबाबत जनजागृती केली जाते. महाविद्यालयांत तसेच पथनाट्ये सादर करून लोकांना आवाहन केले जाते. दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात, गुन्हे यांची माहिती दिली जाते.
अन्य जिल्ह्यांतील कारवाई (जानेवारी 2016 ते जून 2017)
जिल्हा प्रकरणे
पुणे ग्रामीण 4,176
सांगली 4,301
सोलापूर ग्रामीण 1,309
चंद्रपूर 3,531
नागपूर ग्रामीण 4,523
पालघर 1,269
ठाणे शहर 14,580
औरंगाबाद शहर 1,106
नवी मुंबई 4,256
|