मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे नुकसान झालेल्या एका विद्यार्थ्याने विद्यापीठाविरोधात 20 लाख रुपये भरपाईचा दावा ठोकला आहे.
कांदिवलीत राहणाऱ्या या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात नुकसानभरपाई मागणारी याचिका दाखल केली आहे. या विद्यार्थ्याने कायद्याच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी सीईटीची परीक्षा दिली आहे. त्याच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचा निकाल रखडला होता; परंतु सहाव्या सत्राचा निकाल प्रथम जाहीर झाला. त्यात त्याला उत्तम गुण आहेत; मात्र नंतर पाचव्या सत्राचा निकाल जाहीर झाला. त्यात त्याला कमी गुण आहे. शिवाय एका विषयात तो अनुत्तीर्ण झाला आहे.
मूल्यांकनाच्या गोंधळात वाणिज्य शाखेच्या हजारो उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला तरी उत्तरपत्रिकाच नसल्या तर त्या तपासणार कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्याला सीईटीतही चांगले गुण मिळाले आहेत; मात्र विद्यापीठाच्या गोंधळामुळे कायद्याचा अभ्यास करण्याचे त्याचे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने न्यायालयात याचिका केली आहे.
|