मुंबई - रत्नागिरी येथील नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचा दावा शिवसेनेने केला. कोणत्याही परिस्थितीत कंपन्यांशी करार होणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी "वर्षा' निवासस्थानावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
नाणार रिफायनरीविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर शिवसेनाही या प्रकल्पाच्या विरोधात उतरली. यावरून विधिमंडळाच्या अधिवेशनातही वादळी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या असहमतीच्या पत्रांचा गठ्ठाच मुख्यमंत्र्यांना सुपूर्त केला. त्यावर नागरिकांचा विरोध असेल तर प्रकल्प होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरीविरोधातल्या ग्रामस्थांचे शिष्टमंडळ, तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत आदी बैठकीला उपस्थित होते.
लोकभावनेचा सकारात्मक विचार करू - मुख्यमंत्री
मुंबई - नाणार येथील ग्रीन रिफायनरीसंदर्भातील लोकांच्या भावनांचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. ही माहिती नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर सावंत यांनी आज मुंबईतून "सकाळ' ला दूरध्वनीवर बोलताना दिली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज रात्री वर्षा निवासस्थानी श्री. फडणवीस यांची भेट घेऊन नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी केली. यावेळी सर्वांनी अशी भूमिका मांडली, की नाणार रिफायनरीचा अध्यादेश चुकीच्या पध्दतीने काढला आहे. तो आधी रद्द करावा. त्याचवेळी प्रकल्पाविरोधात असलेल्या लोकभावनाही समजून घ्याव्यात.
या बैठकीला ठाकरे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि सचिव मिलिंद नार्वेकर तसेच रिफायनरीला विरोध करणाऱ्या नऊ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
|
|
|