आराखडा तयार; संबंधित विभागांना प्रस्ताव सादर
मुंबई - किल्ल्यांमधील टेहळणी बुरजांप्रमाणे मुंबईच्या प्रवेशद्वारांवर पोलिस विशेष तळ बनवणार आहेत. याबाबत विशेष सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे.
याविषयी राज्य सरकारचे संबंधित विभाग आणि मुंबई महापालिकेला प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यात जकात नाक्याच्या बाजूला जागा देण्याची विनंती करण्यात आली आहे. मानखुर्द, दहिसर व मुलुंड जकात नाक्यांशेजारी हे तळ उभारण्यात येतील. मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले, की मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. विशेष माहिती मिळताच संशयितांना वेळीच पकडणे यामुळे शक्य होईल.
शहराच्या प्रवेशद्वारांवर वाहनांची गती संथ असते. त्यामुळे वाहनांवर बारीक लक्ष ठेवणे सोपे जाते. सध्या जकात नाक्यांच्या शेजारी काही ठिकाणी पोलिस चौक्या आहेत, परंतु त्यांची जागा योग्य नाही. मानखुर्द जकात नाक्याजवळची चौकी मुख्य रस्त्यापासून थोडी आतमध्ये आहे. त्यामुळे तेथून वाहनांवर नीट लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे जकात नाक्यांजवळ हे तळ उभारण्यास परवानगी देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. गुन्ह्यांतील आरोपी मुंबईबाहेर पळण्याच्या तयारीत असताना या तळावरील पोलिसांना वेळीच माहिती दिल्यास त्यांना अटक करणे शक्य होईल. मुंबईत येणाऱ्या गुन्हेगारांविषयी माहिती मिळाल्यास या नाक्यांवर त्यांना अटक करता येईल.
|