कुत्र्यांचे निर्बीजीकरण अडचणीत येण्याची शक्‍यता

कुत्र्यांचे निर्बीजीकरण अडचणीत येण्याची शक्‍यता

मुंबई - मुंबईतील भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या निर्बीजीकरणावर आक्षेप घेण्यात आला आहे. यासाठी कुत्रे पकडताना वापरली जाणारी पद्धत चुकीची आहे, असा आरोप प्राणिमित्र संघटना करत आहेत. याविरोधात ऍनिमल वेल्फेअर बोर्ड आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

निर्बीजीकरणासाठी महापालिकेने खासगी संस्थांची नियुक्ती केली आहे. कुत्र्यांना जाळीत पकडून गळ्यात फास अडकवला जातो. अनेकदा फास तोंडात अडकल्याने त्यांना प्रचंड वेदना होतात, असा आरोप प्लांट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटीचे सुनिश सुब्रमण्यम यांनी केला. तसेच कुत्र्यांना पकडण्यासाठीच्या पद्धतीतही साम्य नसून यात कायद्याचे उल्लंघन होत असल्याची तक्रार पॉझ या प्राणिमित्र संघटनेने केली आहे.
काही वर्षांपूर्वी ऍनिमल वेल्फेअर बोर्डने उंदीर मारण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेतला होता. त्या वेळी ही पद्धत बंद करण्याची शिफारस बोर्डाने केली होती. त्यामुळे जर कुत्रे पकडण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला तर पालिकेच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. पॉझ संस्थेने पाठवलेले पत्र अद्याप पाहिलेले नाही, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

- मुंबईतील भटक्‍या कुत्र्यांची संख्या - 95 हजार 172
- निर्बीजीकरणासाठी सहा संस्था
- लवकरच प्रभागानुसार 24 संस्थांची नियुक्ती

वर्ष - निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या
2014 - सात हजार 236
2015 - सहा हजार 414
2016 - नऊ हजार 741

डिसेंबर 2016 पर्यंत
पाच वर्षांत तीन लाख 28 हजार नागरिकांना चावा
पाच वर्षांत 41 हजार 385 श्‍वानांचे निर्बीजीकरण

2013 पासून कुत्रा चावल्याने 18 नागरिकांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com