मुंबई - अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील जलवाहिनी लगतच्या झोपड्यांवर महानगरपालिकेच्या "के' पूर्व विभाग कार्यालयाने सोमवारी सकाळी कारवाई केली. सुमारे 50 वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या येथील रहिवाशांना पर्यायी घरे न देताच पालिकेने झोपड्या तोडल्याने शेकडो जणांचे संसार रस्त्यावर आले.
ऐन पावसाळा तोंडावर आला असतानाच सहार गाव, तलाईपाडा, आनंदनगर, अशोकनगर, नेहरूनगर, पंचशीलनगर, शिवाजीनगर, रमाबाई आंबेडकरनगर, चव्हाण चाळ, उपाध्यायनगर व पाईल लाइन लगतच्या इतर झोपड्यांवर कारवाईची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. पालिकेने अंधेरी किंवा आसपासच्या परिसरात पुनर्वसन करावे, अशी मागणी रहिवाशांनी वारंवार करूनही पालिकेने त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. झोपड्या तोडल्याने रहिवासी आता परिसरात घरांच्या शोधात आहेत. मात्र, घरमालक आणि दलालांनी घरांचे भाडे दुप्पट केल्याने रहिवाशांना मैदानात राहावे लागणार आहे.
|