मुंबई - शिधावाटप केंद्रावर धान्य खरेदी केल्यानंतर यापुढे पावतीऐवजी ग्राहकाच्या मोबाईलवर एसएमएस पाठवण्यात येणार आहे. ग्राहकाने शिधापत्रिका, आधार कार्डला मोबाईल क्रमांक जाडले असेल तर ही सुविधा सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाने यासाठीचा एसएमएस गेटवे तयार केला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यासाठी अन्न व नागरीपुरवठा विभागाने खासगी दूरसंचार कंपन्यांकडून एसएमएस पॅक घेतले होते. पण, आता नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने हा एसएमएस गेटवे तयार करून दिला आहे. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर एसएमएस पाठवणे शक्य होईल. शिधावाटप केंद्रानिहाय असणाऱ्या डाटाबेसनुसार हे एसएमएस लाभार्थीच्या मोबाईलवर मिळतील. सध्या राज्यात 1 कोटी 48 लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना महिन्याला प्रत्येकी पाच किलो धान्य याप्रमाणे 3 लाख 80 हजार मेट्रिक टन धान्यवाटप करण्यात येते.
धान्यासाठी आधार पडताळणी प्रकल्प मार्चअखेरीपर्यंत पूर्ण करण्याचा विभागाचा मानस आहे. पावतीऐवजी एसएमएस देणे हा डिजिटायजेशनचा भाग असल्याची माहिती विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. विभागाचा कारभार पेपरलेस करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
|