मुंबई - वैयक्तिक कारणांसाठी विकसकाला वेठीस धरणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. सोसायट्यांनी आपापसांतील वाद तातडीने न सोडवल्यास एसआरए स्वत: विकसकाची भूमिका पार पाडेल, असा इशारा एसआरएने दिला आहे.
भांडुप येथील वक्रतुंड को-ऑप. हौ. सोसायटीच्या प्रकरणात प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी विश्वास पाटील यांनी नुकतीच सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये पाटील यांनी सोसायटीतील दोन गटांना सामोपचाराने एकत्रित येण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. तीन आठवड्यांनंतरही दोन गट एकत्र येऊन प्रकल्प राबवण्यास तयार न झाल्यास प्राधिकरण स्वत: विकसकाची भूमिका पार पाडेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. या सोसायटीला प्राधिकरणाने 2009 मध्ये बांधकाम परवाना दिला आहे. आजपावेतो ही योजना मार्गी लागलेली नाही. दोन गट निर्माण झाल्याने ही योजना रखडली आहे.
मुंबईतील सुमारे 200 हून अधिक योजना सोसायट्यांमधील अंतर्गत वादांमुळे मार्गी लागू शकलेल्या नाहीत. या सोयसाट्यांचा विकास तातडीने मार्गी लागावा, यासाठी एसआरएने हा निर्णय घेतला आहे.
|