आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा उपक्रम
मुंबई - भारतीय नागरिकांची आयुर्मर्यादा वाढली आहे. वाढते आयुष्य निरोगी राहावे, यासाठी काय करणे अपेक्षित आहे आणि भारतातील आजारांचे प्रमाण याचा अभ्यास करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत हा अभ्यास सुरू आहे.
भारतीयांची आयुर्मर्यादा वाढत असली, तरी त्याबरोबर आजारांचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या वयात होणारे आजार, त्यांचा होणारा परिणाम आदींचा अभ्यास करण्यात येत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील 45 वर्षांपासूनच्या व्यक्तींचा या सर्वेक्षणामध्ये अभ्यास सुरू आहे. या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आजारांची कागदोपत्री दखल घेण्याबरोबरच संबंधित आजाराची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास रक्ततपासणी, रक्तदाब चाचणी, उंची, वजन याबरोबरच मानसिकता, शारीरिक हालचाल करण्याची क्षमता तपासण्यात येईल, असे संस्थेचे संचालक डॉ. लईशराम लडूसिंघ यांनी सांगितले.
शारीरिक हालचालींमध्ये व्यक्तीला स्वतःहून कपडे घालता येणे, स्वच्छतागृहाचा वापर करणे, किती किलोमीटर एकटे फिरता येते आदी माहिती जमवण्यात येत आहे. हे काम 25 वर्षे सुरू राहील. सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची दर पाच वर्षांनी शारीरिक तपासणी करण्यात येईल. वृद्धांचे आजार, त्यांना होणारे त्रास यासाठी वेगळी रुग्णालये असावीत, असे केंद्र सरकारला सुचवण्यात आल्याचे डॉ. लडूसिंघ यांनी सांगितले.
|