नागरिक हैराण; टाटाकडून मात्र इन्कार
मुंबई - पश्चिम उपनगरांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. टाटा पॉवरकडून याचा इन्कार करण्यात आला आहे.
विलेपार्ले ते मरोळ, एअरपोर्ट रोड, जोगेश्वरी, गोरेगावपर्यंतच्या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. 13 मे व 3 जूनला या परिसरातील वीजपुरवठा खूप वेळ बंद होता. यासंदर्भात नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईच्या पश्चिम उपनगरांत अनियमित वीजपुरवठा होत असल्याच्या आरोपांचा टाटा पॉवरने इन्कार केला आहे. टाटा पॉवर नेटवर्कच्या काही ग्राहकांचा दोन डबल केबल फॉल्टमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. विविध सरकारी, खासगी संस्थांमार्फत केल्या जात असलेल्या खोदकामांमुळेच हे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले होते. याची तातडीने दखल घेऊन तत्काळ वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी टाटा पॉवर कंपनीने पर्यायी व्यवस्था तत्काळ दिली होती, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.
|