मुंबई - कोकणातील मच्छीमारांमध्ये वारंवार वाद निर्माण होत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि मच्छीमारांचे हित जपण्यासाठी बेकायदा मासेमारी करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पोलिसांची मदत देण्यात येईल, अशी माहिती मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत क्रॅब हॅचरीजची निर्मिती, पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन (केज फिशिंग) आदी योजना राबविण्याच्या सूचनाही जानकर यांनी विभागाला दिल्या. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत आधुनिक जेट्टी उभारणीचे प्रस्ताव तयार करावेत, असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा, तसेच कोकण विभागात परराज्यांतून येऊन मच्छीमारी केली जात असल्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमार, तसेच यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. राज्यातील मच्छीमारांचे हित जोपासण्यासाठी या बेकायदा मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांबाबत पोलिसांकडून आवश्यक ते साह्य दिले जाणार आहे. समुद्रात मासेमारी करण्यासंबंधी सोमवंशी समितीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास करून त्यावर संशोधन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. समुद्रातील मत्स्यसाठ्यांचे संवर्धन करून पर्यावरणास अनुकूल पद्धतीने मासेमारी कशा प्रकारे करावयाची याबाबतही या समितीने केलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे जानकर म्हणाले.
|