मुंबई - रखडलेल्या निकालांमुळे टीकेचे धनी ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख बुधवारी (ता. 9) रजेवर गेले. वारंवार सूचना देऊनही निकालाची मुदत न पाळल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तरपत्रिका तपासणीप्रकरणी राज्यपालांनी दिलेली मुदत न पाळल्याने विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या प्र-कुलगुरुपदी "व्हीजेटीआय'चे संचालक धीरेन पटेल यांची नियुक्ती झाली आहे.
कलिना विद्यापीठातील परीक्षा भवनात राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे दररोज भेट देत आहेत. तंत्रज्ञान, कला व व्यवस्थापन विषयाच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत; मात्र केवळ "डबल बारकोड'मुळे निकाल जाहीर होत नसल्याचे रेड्डी आणि कुंटे यांच्या लक्षात आले. त्यामुळे डॉ. देशमुख यांची गच्छंती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांची चौकशीही सुरू केली जाईल, असेही सांगण्यात आले.
|