मुंबई - मुंबईतील तलावही असुरक्षित बनले असून, निर्जनस्थळी "शक्तिमिल'सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती नगरसेवकांनी स्थायी समितीत व्यक्त केली. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने गैरप्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या सुरक्षारक्षकांच्या 968 जागा रिक्त आहेत; त्या तत्काळ भराव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीत केली.
महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयांत, रुग्णालयांच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची कमतरता असताना येथील जागा भरण्यास प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक नाहीत. सायन तलाव, सायन किल्ला येथे सुरक्षारक्षक नसल्याने येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने तलाव परिसर असुरक्षित होत आहे. यासंदर्भात भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर आणि शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीत मुद्दा मांडला.
महापालिकेने अडीच वर्षांपूर्वी सायन तलाव ताब्यात घेतला. येथे साडेचार हजार गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. सर्वांत मोठे असलेल्या या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने या तलावाची स्वच्छता आणि सुरक्षेकडे तातडीने लक्ष द्यावे, असेही सातमकर यांनी सांगितले. पवई तलावाच्या ठिकाणीही अपुरी सुरक्षा व्यवस्था असून, तेथे देखभाल नीट केली जात नाही, असे शिवसेनेचे नगरसेवक सदानंद परब यांनी सांगितले.
|