नवी मुंबई - मुंबई शहरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे वाहतूक ठप्प झाल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे व्यापारी फिरकलेच नाहीत; तर पावसाच्या भीतीमुळे बुधवारीही व्यापारी बाजारात न आल्यामुळे भाजीपाल्याला उठाव नव्हता. या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे दर घसरले असून, मोठ्या प्रमाणावर भाजीपाला सडला आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत भाजीपाला बाजारात 600 गाड्यांची आवक झाली होती; मात्र, पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने मुंबईतून येणारे व्यापारी बाजारापर्यंत पोचू शकले नाहीत. पावसामुळे आज बाजारात 450 गाड्या पोचल्या; पण कालच्याप्रमाणे आजही व्यापारी न आल्यामुळे भाजीपाला पडून राहिला. त्याचबरोबर पावसात भिजल्यामुळे निम्मा भाजीपाला खराब झाला. गोण्यांमध्ये ठेवलेल्या भाज्या गरम होऊन सडल्या आहेत. त्यामुळे त्या फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. मागणी नसल्यामुळे भाजीपाल्याचे दर 20 ते 30 टक्क्यांनी कमी झाले आहेत; मात्र कमी दरानंतरही खरेदी होत नसल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
पावसामुळे आज बुधवारी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली; मात्र पावसामुळे दर घसरले आहेत. बाजारात खरेदीसाठी ग्राहक नसल्यामुळे माल पडून आहे.
- शंकर पिंगळे, माजी संचालक, भाजीपाला बाजार
|