
Police Recruitment : मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेनंतर 7076 उमेदवारांची निवड; आता पडताळणी...
केदार शिंत्रे
मुंबई : मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आधी मैदानी त्यानंतर लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची पडताळणी प्रक्रिया आता सुरू होणार आहे. लेखी परीक्षेनंतर पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेनंतर 7076 उमेदवारांची निवड करण्यात आली असून 8970 उमेदवार वेटींग लिस्टमध्ये मध्ये आहे. तर चालक पदासाठी 994 उमेदवार निवडले गेले असून 1470 उमेदवार प्रतिक्षा यादीत आहेत.
निवड समिती मार्फत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर आता पुढील पडताळणी प्रक्रिया सुरू होईल. यात उमेदवाराची कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी , शारीरिक पडताळणी अशा प्रक्रियांचा समावेश आहे.
पोलीस शिपाईसाठी 7076 उमेदवारांची निवड
मुंबई पोलीस दलातील भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई पदासाठी 763451 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले होते. या अर्जांपैकी प्रत्यक्ष मैदानी चाचणीमध्ये 360309 उमेदवारांनी सहभाग घेतला. मैदानी चाचणीतून 83 हजार उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले. यातून 78502 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत सहभाग घेतला. या 78502 उमेदवारांपैकी 12221 उमेदवाराना लेखी परीक्षेत 40 पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे ते अपात्र ठरले. भरती प्रक्रियेतील नियमाप्रमाणे लेखी परीक्षेत 40 पेक्षा कमी गुण मिळाल्यास उमेदवार अपात्र ठरतो. या प्रक्रिया अंति एकूण 7076 उमेदवारांना निवड सूचित स्थान मिळाले असून 8970 उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.
चालक पदासाठी 994 उमेदवार यादीत
भरती प्रक्रिया त चालक या पदासाठी 118744 अर्ज उमेदवारांनी केली होती. या या उमेदवारांपैकी 78532 उमेदवारांनी प्रत्यक्षात मैदानी चाचणीत सहभाग घेतला.यात 57474 उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले. यातून पुढे झालेल्या कौशल्य चाचणीत 12550 उमेदवार पात्र ठरले. 10346 उमेदवार लेखी परीक्षेनंतर पात्र ठरले. यातून 994 उमेदवारांना निवड सूचित स्थान मिळाले आहे. तर 1470 उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आहेत. यानंतर पुढील पडताळणी प्रक्रिया निवड समितीद्वारे सुरू करण्यात येईल
पडताळणी प्रक्रिया
निवड समिती मार्फत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल .त्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या सोबतच उमेदवारांना कॅरेक्टर सर्टिफिककेट म्हणजेच चारित्र्य प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. तसेच उमेदवाराना स्थानिक पोलीसांकडून शेरा घेणे प्रक्रियेचा भाग आहे.
या सर्व पडताळणी प्रक्रियेतून जे उमेदवार योग्य ठरतील अशा उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन कार्यात रुजू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. जवळजवळ मुंबई पोलीस दलातील 8000 पदांवर भरती असल्यामुळे तसेच उमेदवारांची संख्या मोठी असल्याने पडताळणीची प्रक्रिया काही महिने चालणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळत आहे
" पोलीस भरती आता त्याच्या अंतिम टप्प्यात आली आहे. लेखी परीक्षेनंतर पुढे उमेदवारांची पडताळणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर या पडताळणीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाच पुढे कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे"
- तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त ,मुंबई पोलीस