मुंबई - मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईला रविवारीही पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीच्या शक्यतेने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली; तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही दुपारनंतर घरचा रस्ता धरला. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. मंगळवारीही अतिवृष्टीची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे.
कुलाबा येथे 24 तासांत 149 आणि सांताक्रूझ येथे 122 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी तुंबल्याने तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा 30 ते 45 मिनिटे उशिराने सुरू होती.
नैऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मंगळवारी अरबी समुद्रावरून ताशी 60 कि.मी. प्रतिवेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे बुधवारी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
दाणादाण...
- मुंबई - 32 ठिकाणी शॉर्टसर्किट,23 ठिकाणे झाडे पडली, 19 घरांची पडझड
- ठाणे - येऊरच्या डोंगर परिसरात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
- पनवेल - टेमघर, उमरोली गावांचा संपर्क तुटला
- उल्हासनगर, ठाणे, कुर्ला, शीव येथे रेल्वे रुळांवर पाणी
- नालासोपारा स्थानकात पाणी
- एसी लोकल सकाळी 9 वाजल्यानंतर बंद
|